राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला तो निर्णय तात्काळ रद्द करा अन्यथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करणार !शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांचा इशारा


सावंतवाडी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाचे कायद्यात रूपांतर झाल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
त्यामूळे शासनाने हा निर्णय रद्द करावा . अन्यथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल. असा इशारा आज सावंतवाडी या ठिकाणी पाटील कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
या बैठकीला निवृत्त सहाय्यक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक , माजी पंचायत समिती सदस्य बाबल अल्मेडा , माडखोल माजी सरपंच संजय राऊळ, अभय किनलोस्कर आदी उपस्थित होत. महाराष्ट्र शासनाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाड तोडणाऱ्यांवर पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. यापुढे शेतकरी गरजेपुरते झाड तोडू शकणार नाहीत. तसेच यामुळे वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराचा मार्ग खुला होणार आहे. यातून ब्लॅकमेलिंग होऊन शेतकऱ्यांना नाडले जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध होणे आवश्यक आहे. गावागावात या संदर्भात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन या निर्णयाची माहिती देण्यात येईल. त्यानंतर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल असे शेतकरी संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेतकरी अगोदर त्रस्त आहेत त्यात हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेताना जिल्ह्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण काय करत होते असा सवाल करून केसरकर यांनी हा निर्णय रद्द न झाल्यास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला .