शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार -सौ. ऋचा कुलकर्णी


तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील मुंबई येथील गेजस बॉर्डन इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीव्दारे देण्यात आलेल्या स्कूल बसच्या शालार्पण सोहळा थाटात संपन्न
सावंतवाडी
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि तो प्राप्त करताना त्याला कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत. हाच या बस दाना मागचा मुख्य विचार आहे. शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे. या स्कूल बसचा उपयोग करून अधिकाधिक विद्यार्थी नियमितपणे शाळेत येतील आणि आपले भवितव्य घडवतील अशी मला आशा आहे. ही बस फक्त वाहन नाही तर विद्यार्थ्यांना स्वप्नांच्या दिशेने नेणारा मार्ग आहे. असे प्रतिपादन मुंबई येथील गेजस बॉर्डन लिमिटेड कंपनीच्या संचालिका सौ. ऋचा कुलकर्णी यांनी केले.

सौ. कुलकर्णी या तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील मुंबई येथील गेजस बॉर्डन इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीव्दारे देण्यात आलेल्या स्कूल बसच्या शालार्पण सोहळ्याच्या उद्घाटन समारंभावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री विजय रेडकर तसेच गेजस बॉर्डन इंडिया प्रा लिमिटेड कंपनीचे संचालक अमरेंद्र कुलकर्णी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, संस्था संचालक अशोक वराडकर, सुरेश गावडे, रवींद्र परब, संस्था सदस्य भूषण पेडणेकर, दादा पेडणेकर, देवेश कावळे, सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती पंकज पेडणेकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गणपत पांढरे, सहसचिव योगेश दळवी, सदस्य उमेश पावणोजी, प्रभाकर कुंभार, आत्माराम तांडेल, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. तृप्ती सातार्डेकर, सहसचिव सौ. नेहा बुगडे, सदस्य सौ. रेखा तळवणेकर, सौ. अंजली कावळे, सौ. अंजनी लोके, मैथिली जाधव, सौ.साक्षी शेटये, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, ज्येष्ठ शिक्षिका सौ मीरा नाईक, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विदुल पाटकर, सामाजिक कार्यकर्ते दादा परब, निळकंठ नागडे, दाजी तुळसकर, विवेकानंद तळवडेकर, लवू पेडणेकर, माजी विद्यार्थी संजय पेडणेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. ऋचा कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.
यावेळी बोलताना सौ कुलकर्णी पुढे म्हणाल्या आजचा हा क्षण माझ्या जीवनातील खूपच आनंदाचा आहे. आपल्या शाळेसाठी नव्या बसचे उद्घाटन करताना मला अपार आनंद होत आहे. अनेक विद्यार्थी दुर्गम भागातून येतात आणि त्यांना शाळेत येताना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सोय होईल याचा विचार करून आपण ही बस शाळेला प्रदान केली आहे. याही पुढे विद्यालयाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यात आपले निश्चितच योगदान असणार आहे.
यावेळी बोलताना अमरेंद्र कुलकर्णी म्हणाले ही बस केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावानेतून आम्ही या विद्यालयाला प्रदान केली आहे. तेव्हा यासाठी कुणीही कुणाच्या ऋणात राहण्याची आवश्यकता नाही. आमचा ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये हीच यामागील आमची तळमळ आहे. यापुढेही विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपले अखंड योगदान राहणार असल्याचे श्री कुलकर्णी म्हणाले.


यावेळी बोलताना विजय रेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले आज शिक्षणाची साधने बदललेली आहेत. ज्ञानाचा पसारा अफाट वाढलेला आहे. नव्या शैक्षणिक साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी करून आपले भविष्य उज्वल घडवावे. आपले आई-वडील, शिक्षक हे आपल्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत असतात. तेव्हा त्यांच्याविषयी मनात नितांत आदर बाळगावा.
यावेळी संजय पेडणेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ऋचा कुलकर्णी यांचा डॉ. भालचंद्र कांडरकर यांच्या हस्ते तर अमरेंद्र कुलकर्णी यांचा विजय रेडकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक रवींद्र परब यांचा श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
मुंबई येथील गेजस बॉर्डन इंडिया प्रा लिमिटेड कंपनीच्या संचालिका सौ. ऋचा कुलकर्णी व संचालक अमरेंद्र कुलकर्णी यांच्या दातृत्वातून
विद्यालयाला अर्पण करण्यात आलेल्या स्कूल बसचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अमरेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी यांनी केले. उपस्थितांचे परिचय व स्वागत किशोर नांदिवडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक दयानंद बांगर यांनी तर सूत्रसंचालन श्री प्रसाद आडेलकर यांनी केले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.