कोकण रेल्वे मार्गावरील जादा होळी स्पेशल रेल्वेना जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी.


अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
सिंधुदूर्ग
शिमगा हा कोकणाच्या सिंधुदुर्ग,रत्नागिरी व रायगड जिल्हयातील गणपतीनंतरचा सर्वात मोठा सण. याला लाखो चाकरमनी आपल्या परिवारासह मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जातात.दरवर्षीच्या गर्दीचा विचार करता व नियमीत रेल्वेचे आरक्षण २ महिन्यांपुर्वीच फुल झाल्याने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावर जादा होळी स्पेशल रेल्वे सोडण्यासाठी कोकण रेल्वे,मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.प्रवासी संघटनेच्या विनंतीला मान देऊन रेल्वे प्रशासनाने ११ मार्च ते २४ मार्च २०२५ च्या दरम्याने आरक्षित व अनारक्षित अशा जादा १४ रेल्वेच्या ३८ अतिरिक्त फेऱ्या मुंबई ते चिपळूण,मुंबई ते रत्नागिरी,मुंबई ते सावंतवाडी व मुंबई ते मडगाव दरम्याने चालवण्यात आल्या आहेत.
इतरवेळी कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यासाठी देवाच्या दारी मंदिरात जातो मात्र शिमगा हा कोकणातील एकमेव असा सण आहे की यावेळी ग्रामदेवतेची पालखी प्रत्येकाच्या घरी येते म्हणूनच शिमग्याला कोकणातील चाकरमनी परिवारासोबत मोठया प्रमाणात मुंबईतून कोकणातील आपल्या गावी जातात.म्हणून चाकरमन्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जादा रेल्वेची मागणी केलेली आहे.
होळीनंतर लगेचच मुंबईतील मुलांच्या परिक्षा संपल्यानंतर एप्रिलमध्ये मोठया प्रमाणात कोकणात जाणारे पालक / चाकरमनी,कोकणातील मे महीन्यातील लगीन सराई,एप्रिल मे मध्ये फळांचा राजा कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा व गोड फणस खाण्यासाठी जाणारे लाखो पर्यटक व जूनपर्यंत कोकणातून परत मुंबईत येणारे पालक यासाठी कोकण रेल्वे मार्गावर ४ महिने प्रवाशांची मोठया प्रमाणात ये जा सुरू असते,नियमीत रेल्वेचे आरक्षणही फुल झाले आहे,म्हणूनच कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी ह्या जादा रेल्वेना जूनपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे अशी माहीती प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी दिली.