मळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्याने लक्ष तात्काळ देणे गरजेचे

मळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्यावर खापर बाधकाम विभागाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे

सावंतवाडी:
सावंतवाडी – माजगाव-मळगाव रस्त्यावरील मळगाव घाटात आज मुसळधार पावसामुळे दगडगोटे ,माती रस्तावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला. घाटातून आलेली माती, दगड आणि गोटे रस्त्यावर पसरल्याने दुचाकीस्वार वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांची चांगलीच धांदल उडाली. दरम्यान काही अपघात घडले त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले पाहिजे असे मत ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले.
या प्रकारामुळे ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची पोलखोल झाल्याचे म्हटले आहे.
राऊळ यांनी निदर्शनास आणून दिले की, मळगाव घाटात गटार नसल्यामुळे यापूर्वीही एकदा पावसाचे पाणी जाऊन मोरी कोसळली होती आणि काही दिवस रस्ता बंद होता. ही बाब सार्वजनिक बांधकाम खात्याला माहिती असूनही, त्यांनी आणि वन खात्याने गॅस पाईपलाईन गटाराच्या बाजूने, गटारातून टाकण्यास परवानगी दिली. ही एक मोठी चूक होती आणि आता सार्वजनिक बांधकाम खात्याला त्याची जाणीव होईल, असे राऊळ म्हणाले.
आजच्या घटनेमुळे रस्त्यावर आलेल्या माती आणि दगडांमुळे लहान मोठे अपघातही झाले. या अपघातात एकाला जीव गमवावा लागला.गॅस पाईपलाईनमुळे गटार बंदिस्त झाल्याने पाणी रस्त्यावर आले आणि गटारात साचलेली माती, दगड रस्त्यावर आल्याने हे अपघात घडल्याचे राऊळ यांनी सांगितले. यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि वन खाते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
राऊळ म्हणाले, मळगाव घाटातील अपघाताना सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळणे सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. रस्त्यावरील गटार गॅस पाईपलाइनला दिल्याने हे अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.
पावसाच्या पहिल्याच दणक्यात ही सत्यस्थिती जनतेसमोर आली आहे. आता तरी बांधकाम खात्याने यावर योग्य तो निर्णय घेऊन वाहनचालकांना या घाटातून सुरक्षितपणे प्रवास करता येईल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन रुपेश राऊळ यांनी केले आहे.