संगणकाची भाषा ज्याला येते तोच खरा साक्षरसौ. ऋचा कुलकर्णी!!तळवडे येतील श्री जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा थाटात संपन्न


सावंतवाडी
आज संगणक ही काळाची गरज आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाची भाषा ज्याला येते तोच खऱ्या अर्थाने साक्षर म्हणावा लागेल. तसेच बाह्य जगात करिअरच्या संधी शोधताना इंग्रजी भाषेशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन मुंबई येथील गेजस बॉर्डन लिमिटेड कंपनीच्या संचालिका सौ. ऋचा कुलकर्णी यांनी केले.
सौ. कुलकर्णी या तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील मुंबई येथील गेजस बॉर्डन लिमिटेड या कंपनीव्दारे निर्माण करण्यात आलेल्या संगणक कक्षाच्या व फॉनेटिक लॅबच्या उद्घाटन समारंभावेळी तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णू जयराम पेडणेकर तसेच गेजस बॉर्डन लिमिटेड कंपनीचे संचालक अमरेंद्र कुलकर्णी, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वज्ञ कुलकर्णी, व्यवस्थापक सिद्धेश मालपेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, खजिनदार डॉ. भालचंद्र कांडरकर, संस्था संचालक अशोक वराडकर, सुरेश गावडे, रवींद्र परब, प्रा.दिलीप गोडकर, संस्था सदस्य भूषण पेडणेकर, दादा पेडणेकर, संस्था सदस्य तथा शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष देवेश कावळे, माता पालक संघाच्या खजिनदार सौ. विद्या नाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, ज्येष्ठ शिक्षिका सौ मीरा नाईक, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विदुल पाटकर माजी विद्यार्थी राजन कामत, श्री खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. ऋचा कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.
यावेळी बोलताना सौ कुलकर्णी पुढे म्हणाल्या तळवडे गावाशी आमची भावनिक गुंतवणूक आहे. या गावासाठी आणि गावातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आम्हाला संधी मिळाली हे आमचे थोर भाग्य आहे. याही पुढे विद्यालयाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यात आपले निश्चितच योगदान असणार आहे.
यावेळी बोलताना अमरेंद्र कुलकर्णी म्हणाले सरस्वती देवी हे विद्येची देवता आहे, तर लक्ष्मी देवी ही धनाची देवता आहे. देवी सरस्वती ही खडकावर तर लक्ष्मीमाता कमळावर विराजमान झालेली असते. कमळ एका जागी कधीही स्थिर राहत नाही. त्याचा अर्थाने धन म्हणजेच पैसा हाही कधी एका जागी स्थिर राहत नाही. मात्र ज्ञान हे एकदा मिळवले की ते कुणीही, कधीही हिरावून घेऊ शकत नाही हा संदेश यातून आपल्याला मिळतो.
सुखाचा मंत्र सांगताना ते पुढे म्हणाले पैशाची जगण्यासाठी गरज आहे, पण पैसा सर्वस्व नाही. ज्ञानाच्या बाबतीत आपण उच्चशिक्षित माणसाकडे बघावे व पैशाच्या बाबतीत आपण आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे बघावे, म्हणजे आपोआप समाधान मिळते व या समाधानानेच सुखही मिळते.
यावेळी बोलताना प्रा. दिलीप गोडकर म्हणाले पैसा सर्वांकडे असतो, मात्र दातृत्व हे दुर्मिळ असते. ते कुलकर्णी परिवाराकडे आहे म्हणून ते थोर आहेत. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांच्या बुद्धिमत्तेला कष्टाची जोड मिळाली अन् आवश्यक सोयी सुविधा मिळाल्या तर त्यांचे जीवन नक्कीच यशस्वी होईल.
यावेळी सर्वज्ञ कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ऋचा कुलकर्णी यांचा वि.ज. पेडणेकर यांच्या हस्ते तर अमरेंद्र कुलकर्णी यांचा श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते तसेच सर्वज्ञ कुलकर्णी यांचा डॉ. भालचंद्र कांडरकर यांच्या हस्ते तर सिध्देश मालपेकर यांचा प्रतापराव देसाई यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मुंबई येथील गेजस बॉर्डन लिमिटेड कंपनीच्यामार्फत प्रोत्साहनात्मक पारितोषकांचे वितरण करण्यात आले.
मुंबई येथील गेजस बॉर्डन लिमिटेड कंपनीच्या संचालिका सौ. ऋचा कुलकर्णी व संचालक अमरेंद्र कुलकर्णी यांच्या दातृत्वातून
विद्यालयात साकार झालेल्या संगणक कक्षाचे व फॉनेटिक लॅबचे उद्घाटन प्रमुख पाहुणे ऋचा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अमरेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दयानंद बांगर यांनी यांनी केले. उपस्थितांचे परिचय व स्वागत अंकुश चौरे यांनी केले. पारितोषिकांचे वाचन किशोर नांदिवडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. मिलन देसाई यांनी तर सूत्रसंचालन श्री प्रसाद आडेलकर यांनी केले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.