भूमिपत्रांनो, अधिकारी होण्यासाठी पेटून उठा.! – प्रा. रुपेश पाटील यांचे आवाहन.


हुमरस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रामपंचायतचे अभिनव आयोजन.
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे. आपल्या जिल्ह्याचा शालांत परीक्षेचा निकाल राज्यात सर्वाधिक आहे. मात्र हीच गुणवत्ता स्पर्धा परीक्षांमध्ये फारशी दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करावयाचा असेल तर येथील भूमिपुत्रांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी, आपला भूमिपुत्र अधिकारी झाल्यास जिल्ह्याचा विकासात्मक चेहरा नक्कीच बदलेल, असा आशावाद सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी हुमरस येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान केले.
ग्रामपंचायत हुमरस यांच्यावतीने दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व ‘दहावी – बारावीनंतरचे करिअर कसे करावे?’ याविषयी मार्गदर्शन शिबीर जि. प. प्राथमिक शाळेच्या सभागृहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. रुपेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त, लोकप्रिय सरपंच सिताराम तेली होते. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्वोदय सहकारी पतसंस्थाचे संचालक ज. मू. कदम, उपसरपंच प्रवीण वारंग, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक शिवलकर, ग्रा. प. सदस्य ज्ञनेश्वर सावंत, सिद्धेश नाईक, ग्रा. प. सदस्या सौ. श्रुती चिपकर, सौ. सुमन कुडकर, मुख्याध्यापिका सौ. दिप्ती तळवणेकर, ग्रामसेवक बापूसाहेब फुंदे तसेच हुमरस ग्रामस्थ विष्णू परब, साबाजी नाईक, लक्ष्मीकांत वेजरे, सोनू मेस्त्री, अरुण मेस्त्री, सुधाकर मेस्त्री, आपा लंगवे, बाबुराव भोसले, गणेश जडये आदि उपस्थित होते.
यावेळी प्रा. रूपेश पाटील यांनी दहावी व बारावीनंतरचे करिअर कसे करावे?, शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन संधी कोणकोणत्या आहेत?, विविध स्पर्धा परीक्षा कोणत्या व त्यासाठी आपण काय केले पाहिजे?, कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कास का धरावी? आदि सर्व विषयांवर सविस्तर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निरसन देखील केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सिताराम तेली यांनी केले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक ज. मू. कदम यांनीही विद्यार्थ्यांना भविष्यात आपण काय केले पाहिजे? याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नीलेश तेली यांनी केले.