तंत्रज्ञानाच्या युगातही महिलांच्या आरोग्याचे प्रश्न कायम

तळवडे

आज माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने प्रचंड प्रगती केली असली, तरी ग्रामीण भागातील महिलांच्या, मुलींच्या आरोग्याचे प्रश्न आजही कायम आहेत. मुक्त संवादाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव, भिडस्तपणा व अज्ञान यामुळे स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न अधिकच गंभीर होत आहेत. या प्रश्नांबाबत समाजमन, स्त्रीमन जागृत करणे अतिशय आवश्यक आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास सातोस्कर यांनी केले.

श्री सातोस्कर हे तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘किशोरवयीन मुलींचे आरोग्य व आहार’ या विषयावरील व्याख्यानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे सचिव प्रवीण परब, रोटरीयन दिलीप म्हापसेकर, व्याख्यात्या श्रीम. विनया बाड, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, ज्येष्ठ शिक्षिका सौ.मीरा नाईक शिक्षिका सौ. मिलन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री सातोस्कर पुढे म्हणाले ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचणं ही शक्य कोटीतील बाब नाही. म्हणून विद्यार्थिनींनी गावा-गावातील महिलांपर्यंत पोहचून व्याख्यानातून मिळालेल्या ज्ञानाधारे त्यांच्या मनात आरोग्याच्या प्रश्नाविषयी जागरूकता निर्माण करावी.

यावेळी बोलताना दिलीप म्हापसेकर म्हणाले, आज महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच पर्यावरणाच्या आरोग्याचे प्रश्नही अधिकच गंभीर होत आहेत. यासाठी आपल्या संस्थेकडून वृक्षारोपणाचे उपक्रम राबवले जात आहेत. यावर्षी एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प संस्थेने केला आहे. या संकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना मागणीनुसार रोपांचे वाटप केले जाणार आहे.

यावेळी व्याख्यात्या श्रीम. विनया बाड यांनी स्त्रियांच्या आरोग्याविषयीच्या अनेक समस्यांबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तसेच किशोरवयीन मुलींनी या वयात कोणता आहार घ्यावा व कोणत्या प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री. देसाई म्हणाले रोटरी क्लबच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमासाठी आपल्या विद्यालयाची निवड केली जाते. विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीस या संस्थेने मोठा हातभार लावला आहे. याबद्दल आपण या संस्थेचे सदैव ऋणी आहोत.

यावेळी रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे चरित्र व स्त्रियांच्या समस्यांविषयी जागृकता निर्माण करणारे ‘अस्मिता’ हे पुस्तक. अशी पुस्तके भेट देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक प्रसाद आडेलकर यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. मिलन देसाई यांनी केले.