ध्येयाचा ध्यास आणि कठोर मेहनत हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली – चित्रा गडेकर


सावंतवाडी
स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी संयम व शिस्त फार महत्त्वाची असते. ध्येयाचा ध्यास आणि कठोर मेहनत हीच स्पर्धा परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे. ध्येयापासून विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना बळी न पडता अखंड अविरत प्रयत्न करीत राहिल्यास यश आपलेच आहे. असे प्रतिपादन विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कुमारी चित्रा गडेकर यांनी केले.
एकाच वेळी ग्रामसेवक, तलाठी व सहाय्यक लिपिक अशा तीन स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादन करून वेंगुर्ले पंचायत समिती शिक्षण विभागात सहाय्यक लिपिक या पदावर रुजू झाल्याबद्दल कुमारी गडेकर यांचा तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कुमारी गडेकर या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा नाईक, शिक्षक प्रसाद आडेलकर, शिक्षिका सौ. मिलन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुमारी गडेकर यांचा श्री. देसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना कुमारी गडेकर पुढे म्हणाल्या संकटे ही तर आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असतात. संकटांनी खचून जाऊ नये. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आपल्याला खरी प्रेरणा ही आपल्या घरातून, कुटुंबातून मिळत असते. आपले आई-वडील दिवस-रात्र कष्ट करत असतात. मग आपण दिवस-रात्र अभ्यास का करू नये? असा स्वतःला प्रश्न विचारला तर आपल्याला आपोआपच कष्ट करण्याचे बळ व प्रेरणा मिळते.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री देसाई म्हणाले चित्रासारख्या विद्यार्थीनी हे आमच्या विद्यालयाचे भूषण आहेत. ग्रामीण भागात राहून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही यश संपादन करता येते. हे दाखवून देत, चित्राने विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. आई-वडिलांच्या श्रमाची आणि छोट्या बहिणीच्या त्यागाची जाणीव ठेवून चित्राने अथक परिश्रम केले. त्यातून तिला हे धवल यश प्राप्त झाले आहे. या यशाने चित्राने केवळ आई-वडिलांचा नाही तर विद्यालयाचा आणि आम्हा सर्व शिक्षकांचाही नावलौकिक वाढवला आहे.
यावेळी बोलताना श्री आडेलकर म्हणाले आपल्या मोठ्या बहिणीला शिकता यावे म्हणून चित्राच्या लहान बहिणीने आपले शिक्षण थांबून नोकरी पत्करली आणि बहिणीचे स्वप्न पूर्ण केले. या दोघां बहिणींमध्ये असणाऱ्या निस्सीम प्रेमाने समाजासमोर आज एक नवा आदर्श उभा केला आहे. चित्राला मिळालेले यश हे तिच्या जिद्दीतून चिकाटीतून मिळालेले आहे. तिच्या या जिद्दीला, चिकाटीला व परिश्रमाला माझा सलाम आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंकुश चौरे यांनी तर आभार प्रदर्शन दयानंद बांगर यांनी केले.
