सावंतवाडीत निमंत्रितांचे अठरावे विभागीय कवयित्री संमेलन २५ जानेवारी रोजी रंगणार!



सावंतवाडी
चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आरती’ मासिकच्या प्रमुख आयोजनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त सहकार्याने दरवर्षी निमंत्रित कवयित्रींचे ‘विभागीय कवयित्री संमेलन’ संपन्न होत असते. यावर्षी निमंत्रितांचे अठरावे संमेलन २५ जानेवारी २०२५ रोजी श्री राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडीच्या सभागृहात सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी आयोजित केले आहे. तब्बल १८ वर्षे हे संमेलन सातत्याने सुरू असून महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक येथील आघाडीच्या नामवंत कवयित्रींनी या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे.


पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले होते. गोवा, महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवयित्रींना या संमेलनासाठी आमंत्रित केलेले आहे. चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्था, आरती मासिक यांनी संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक महिलांना एक राज्यस्तरीय उत्तम व्यासपीठ निर्माण केलेले असून त्याची जबाबदारी देखील महिलांवर सोपवून त्यांच्या कृतीशीलतेला वाव दिला आहे. या अठराव्या संमेलनाच्या अध्यक्षा मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिका हेमांगी नेरकर आहेत. ज्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेली ४२ वर्षे आरती मासिक प्रकाशित होत आहे, त्या कविवर्य आरती प्रभूंच्या त्या कन्या आहेत. तसेच आमदार अरविंद नेरकर यांच्या सुविद्य पत्नी असून ‘कलामंच’ या मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या अंकाच्या त्या संपादक आहेत. हेमांगी नेरकर एक उत्तम कवयित्री, कथाकार, नाटककार, एकांकिकार व बालक साहित्यिक असून त्यांचे मोठे नाव आहे. ‘ओंजळ’, ‘प्रारब्ध’ हे त्यांचे काव्यसंग्रह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय मंडळाच्या अध्यक्ष नमिता कीर यांच्या हस्ते होणार आहे. त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. ‘दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस’ व ‘झपुर्झा’ या त्रैमासिकच्या त्या संपादिका आहेत. राज्य मराठी विश्वकोश व जिल्हा मराठी भाषा विभाग मंडळाच्या सन्माननीय सदस्य असून अनेक शैक्षणिक संस्थांवर त्या कार्यरत आहेत. ‘काळीज खोपा’ हा काव्यसंग्रह, ‘गझलगाथा’, ‘निवडक झपुर्झा’ वगैरे साहित्य निर्मिती असून दूरदर्शन मुलाखती, परिसंवाद, चर्चासत्रे यामध्येही त्यांचा लक्षणीय सहभाग आहे.
या संमेलनासाठी कोल्हापूरहून डॉ. ईला माटे, साखळी सत्तरी येथील प्रा. पौर्णिमा केरकर, पनवेल येथील अड. माधुरी थळकर, गोव्याहून राजनी रायकर, कविता आमोणकर या नामवंत कवयित्रींना या संमेलनासाठी आमंत्रित केलेले आहे. तसेच सिंधुदुर्गातील उत्तम कविता लिहिणाऱ्या नव्या व जुन्या नामांकित कवयित्रींचा देखील सहभाग असणार आहे. आरती मासिकच्या वतीने सिंधुदुर्ग, गोवा मर्यादित महिला काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते संमेलनात होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे रसिकांच्या उत्तम उपस्थितीत व उत्स्फूर्त प्रतिसादात संमेलन यशस्वी होईल, असा विश्वास आरतीच्या कार्यकारी संपादक व आयोजक प्रतिनिधी साहित्यिक उषा परब, संस्थेचे अध्यक्ष व संपादक डॉ. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत, भरत गावडे, विठ्ठल कदम व कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी व्यक्त केला आहे.

