राज्यात आज होणारं मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट!जिल्हाधिकारी अनिल पाटील

राज्यातील 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्गचाही समावेश

जिल्हाभरात होणार मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल

रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट,

सिंधुदुर्ग
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा यात समावेश असून, आज बुधवार दि. 7 मे रोजी मॉक ड्रिल्स केले जाणार आहे. या 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य यंत्रणा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, प्रथोमोपचार या बाबी सज्ज असणे आवश्यक आहे. यामध्ये आपदा मित्र आणि नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे . या कालावधीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापणचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी याबाबतची आढावा बैठक देखील पार पडली.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सर्तकता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आपल्या संपूर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. जिथे सायरनची व्यवस्था आहे तिथे ठिक 4:00 वाजता 2 मिनिटांसाठी सायरन चढ -उताराच्या स्वरुपात वाजेल. सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी स्वत: सुरक्षित स्थळी जावे. 4:18 मिनिटांनी 1 मिनिटांसाठी शेवटचा सायरन वाजेल. त्यांनतर मॉक ड्रिल संपेल आणि आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलिस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणा मदतीसाठी धावणार आहे. ज्या ठिकाणी सायरनची व्यवस्था आहे अशा ठिकाणी (मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र) सायरन वाजविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतींनी व ज्या बॅकांमध्ये सायरनची सुविधा आहे अशा ठिकाणी सुध्दा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सायरन बाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी म्हणाले.
प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले म्हणाले की, या मॉक ड्रिल दरम्यान सर्व नागरिकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. या मॉक ड्रिल दरम्यान स्वयंसेवक, एनसीसी, एनएसएस तसेच एनजीओंची देखील मदत घेतली जाणार आहे. या मॉक ड्रिल दरम्यान जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनांतर्गत नियंत्रण कक्ष देखील कार्यरत राहणार आहे. मॉक ड्रिल नंतर या कार्यवाहीचा अहवाल सादर केला जाणार आहे. रात्री 8:00 ते 8:15 दरम्यान देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट करण्यात येणार आहे म्हणजेच या पंधरा मिनिटांत या परिसरातील वीज पूर्णपणे बंद केली जाणार आहे. जेणेकरुन शत्रूंना विमानांना त्यांचे लक्ष्य दिसू नये. या दरम्यान नागरिकांनी शक्यतो उजेड होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो वाहने जागेवरच थांबवावीत, नसता एकदम कमी प्रकाशात वाहन चालवावे असेही त्यांनी सांगितले.

हवाई हल्ला झाल्यास नागरीकांनी काय करावे ?

हवाई हल्याची धोक्याची सुचना कमी जास्त आवाजात सायरनद्वारे मिळाल्यावर नागरीकांनी काय करावे ?
1) इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर असल्यास तळ मजल्यावर जावे.
2) घराच्या आतल्या भिंतीं जवळ कोपऱ्यात बसावे.

3) मैदानात असल्यास जमिनीवर पोटावर झोपावे. दोन बोटे कानात, तोंडात रुमाल किंवा नरम वस्तु पकडुन हाताचे कोपर जमिनीवर टेकवुन छाती जमिनीपासुन वर ठेवावी. 4) कार्यालय, शाळा, कॉलेज या ठीकाणी असल्यास टेबल खाली लपावे. 5) चार चाकी गाडी चालवत असल्यास गाडी रस्त्याच्या कडेला उभी करुन चावी गाडीलाच ठेवावी व वरील प्रमाणे आश्रय घ्यावा. 6) रेल्वेने प्रवास करत असल्यास बसल्या जागेवरच बसावे. 7) पाळीव प्राणी जनावरे बांधुन ठेवावीत.

काय करु नये

1) मोकळ्या मैदानात उभे राहु नये. 2) आग लागल्यास इमारती वरुन उड्या मारु नयेत. 3) प्रकाश बंदीच्या काळात वीजेचा (बॅटरी) वापर करु नये. 4) घरात दरवाज्या जवळ किंवा खिडक्या जवळ उभे राहु नये. 5) प्रकाश बंदीच्या काळात घरातील दिवे चालु ठेवुन बाहेर पडु नये. 6) अफवांवर विश्वास ठेवु नये. 7) पाळीव प्राणी व जनावरे यांना मोकळे सोडु नये.

हवाई हल्ला झाल्यानंतर धोका टळल्याचा सायरन वापरल्यावर काय करावे ?

1) आश्रय स्थानातुन बाहेर पडावे.2) जखमींना मदत करावी. प्रथमोपचार करावे. 3) त्याची वाहतुक करावी. 4) लहान मोठ्या आगी लागल्या असल्यास अग्नीशमक यंत्र किंवा आग विझवण्याच्या पद्धतीचा वापर करुन त्या विझवण्यात याव्यात. 5) आलेल्या सेवांबरोबर समन्वय साधावे.

मॉक ड्रिल म्हणजे नेमके काय

मॉक ड्रिल किंवा युध्दाचा सराव ही पध्दत क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ले या दरम्यान निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय केलं पाहिजे ? कुठली काळजी घेतली पाहिजे ? सरकारी यंत्रणांनी कसं कार्यरत राहिलं पाहिजे ? याचा सराव असतो. हवाई हल्ल्यांचा सायरन वाजला की शहरांमध्यले दिवे बंद केले जातात. जेणेकरुन शत्रूच्या मिसाईल्सना त्यांची लक्ष्य दिसू नयेत. तसेच गोंधळ आणि हलकल्लोळ कसा टाळला पाहिजे ? याचाही सराव या प्रक्रियेत केला जातो. थोडक्यात युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युध्द सुरू झाल्यानंतर नागरिकांनी काय काळजी घ्यायची आहे ? सरकारी यंत्रणांनी काय करायचं आहे ? याचा सराव म्हणजे मॉक ड्रिल

.
मॉक ड्रीलची प्रक्रिया कशी असते ?

1) ठरलेल्या वेळेनुसार अलार्म वाजवला जातो किंवा इशारा दिला जातो लोकांना परिस्थितीविषयी सांगिलं जातं (उदा. बॉम्बस्फोटाची, युध्दाची, भूकंपाची सूचना दिली जाते)

2) मॉक ड्रीलची ठिकाणी असलेल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढलं जातं

3) फायर ब्रिगेड, एनडीआरएफ, पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचतात. सर्व प्रक्रियेचं मूल्यांकन केलं जातं.

4) सगळ्या गोष्टींना किती वेळ लागला, काय कामतरता होती आणि कशात सुधारणेला वाव आहे. हे पाहिलं जातं.

5) सद्यस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत उभ्दवली तर त्याचा सराव आधीच झालेला असणं आवश्यक आहे. मॉक ड्रीलच्या माध्यमातून याची पडताळणी करता येते.