शिवपुतळ्याचे अनावरण ही देशासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवपुतळा अनावरण, नौसेना दिन सोहळा न भुतो न भविष्यती होईल!

सिंधुदुर्ग

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे ही आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर नौसेना दिन मालवण मध्ये यावर्षी होत आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम हे न भूतो न भविष्यती असेच होतील असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकोट येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी भेट देत पाहणी केली. यावेळ त्यांचे जल्लोष स्वागत करण्यात आले.

यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, रवींद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, बबन शिंदे, राजा गावकर, नीलम शिंदे, राजू परुळेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सार्वगौड, कुमुदिनी प्रभू, नौदल अधिकारी ,पोलीस अधिकारी तसेच अन्य विभागाचे अधिकारी, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेले दोन महिने राजकोट येथे नौदल व शासनाच्या वतीने शिव पुतळा उभारण्याचे काम हाती घेत ते मार्गी लावण्यात आले आहे. येत्या ४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होईल. नौसेना दिन हा पूर्वी दिल्लीत व्हायचा मात्र यावर्षी तो येथे होत आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांना मोठे अभिवादन आहे. कारण शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक होते. त्यांनी पहिले आरमार सुरू केले. त्याची दखल पंतप्रधानांनी आणि नौदल विभागाने घेऊन नौसेना दिन येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंतप्रधानांचे मी आभार मानत आहे. नौदल विभागाच्या ध्वजावर देखील शिवमुद्रा लावण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांची एक दैवी कृपा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम न भूतो न भविष्यती असा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.