उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही ! मंत्री दिपक केसरकर;!खा.नारायण राणे हे हाडाचे शिवसैनिक

वेंगुर्ला:

उध्दव ठाकरेंना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे युवराज सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांना मिठी मारतात हीच का त्यांची संस्कृती असा सवाल आज महायुतीचे उमेदवार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला.

केसरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वेंगुर्ला येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. नारायण राणे हे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती आणि तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असे ते म्हणाले.

यावेळी श्री केसरकर म्हणाले, कोकणी माणसाचा मला अभिमान आहे. जमीन हे शेतकऱ्याचे हृदय असून जमिनी बळकावणे ही आमची संस्कृती नाही. तेलींची मी माफी मागणार नाही. जेआरडी हॉटेल कोणी फोडले हे जगजाहीर आहे.ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची असून विरोधकांचे तोंड कायमचे बंद करायचे आहे. २,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या मतदारसंघासाठी आणला आहे. ४० कोटी रुपयांची जेटी, १०० कोटी रुपयांचा पाणबुडी प्रकल्प, नावबाग फिशिंग व्हिलेज, नवीन जॉगिंग ट्रॅक, नाट्यगृह, भाजी मार्केट उभारले. तसेच २०० कोटींची तिलारी ते वेंगुर्ला पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आल्यास वेंगुर्ल्याला २४ तास पाणीपुरवठा होणार आहे असे सांगितले.

वेंगुर्ला आरवली येथे ५ स्टार हॉटेल उभारण्यात आले आहे. तर शिरोड्यात ६०० कोटींचे ताज हॉटेल उभारण्यात येणार आहे. तेथील जमीनमालकाना मोबदला देण्यासाठी ६० कोटी रुपयांची अतिरिक्त मंजुरी देण्यात आली आहे. या महायुतीच्या सरकारने महिला, युवक, मच्छिमारांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. येत्या निवडणूकीत मला भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन श्री. केसरकर यांनी कार्यकर्त्यांना केले.