श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता


श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता
चार दिवसीय कालावधीत मंदिर परिसरात आध्यात्मिक चैतन्यमय वातावरण
सावंतवाडी :
मळगाव व सोनुर्ली या दोन गावचे जागृत देवस्थान व दोन्ही गावांच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि सामुदायिक भावनेचे प्रतीक असलेल्या श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या मूर्तीचा ऐतिहासिक व अभूतपूर्व पुनः प्रतिष्ठापना सोहळा २ ते ५ जून या चार दिवसीय कालावधीत असीम उत्साह आणि परमोच्च भक्तिमय वातावरणात दिमाखदारपणे पार पडला. या अलौकिक सोहळ्याने संपूर्ण मंदिर परिसरात आध्यात्मिक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या चैतन्यमय वातावरणात भाविक अक्षरशः न्हाऊन निघाले. काल गुरुवारी सोहळ्याच्या अंतीम आणि मुख्य प्रतिष्ठापना कार्यक्रमाने या सोहळ्याची मोठ्या दिमाखात सांगता करण्यात आली.
काल गुरुवारी सोहळ्याच्या अंतीम आणि मुख्य प्रतिष्ठापना दिवशी, पहाटेपासूनच मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. सोनुर्ली व मळगाव या दोन्ही गावचे मानकरी आल्यावर सकाळच्या मंगलमयी वातावरणात स्थलशुद्धी विधीने कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्यानंतर सीमधडे यांच्या आगमनानंतर देव उठवण्याचा पवित्र विधी मोठ्या भक्तीभावाने पार पडला. तत्वन्यासहोम, तत्वन्यास आणि प्राणप्रतिष्ठा या अत्यंत महत्त्वाच्या विधींनी देवतांमध्ये प्राणशक्ती संचारित करण्यात आली. त्यानंतर देवतांची महापूजा, बलिदान आणि पूर्णाहुती, अभिषेक यासारखे पवित्र विधी पार पडले. त्यानंतर ब्राम्हण व दोन्ही गावच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवाची महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रमानंतर सामूहिक गाऱ्हाणे व त्यानंतर ब्राह्मण पूजन झाल्यावर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मळगाव आणि सोनुर्ली येथील भाविकांसह नेमळे, निरवडे, वेत्ये, माजगाव, कोलगाव, चराटे, कोनापाल या गावांमधील शिमधडे आणि असंख्य भक्तगणही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची ये-जा सुरु होती. सोनुर्ली व मळगाव गावातील मानकरी आणि ग्रामस्थांनी या अलौकिक सोहळ्याचे अत्यंत उत्कृष्ट आणि यशस्वी असे आयोजन केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सोहळा निर्विघ्नपणे आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला,

या चार दिवसीय सोहळ्याचा प्रारंभ सोमवार, २ जून रोजी प्रायश्चित्त विधीने झाला. सकाळी देवाला नारळ अर्पण करून, त्यांची संमती घेऊन केशवपन, पंचगव्य होम, पंचगव्य प्राशन आणि प्रायश्चित्त विधान संपन्न झाले. यामुळे मंदिराचे आणि भाविकांचे शुद्धीकरण झाले. मंगळवार, ३ जून रोजी तत्त्वोद्धार विधी पार पडले. पुण्याहवाचन, संभारदान आणि मधुपर्क विधींनी सुरुवात झाली. यानंतर आचार्यादि ब्राह्मण वरण, स्थलशुद्धी, अज्ञोरहोम, देवांची महापूजा, तत्वचालन होम, तत्वोद्धार आणि पूर्णाहुती दिली गेली, ज्यातून देवतांच्या मूळ तत्त्वांचे पुनर्स्थापन झाले. बुधवार, ४ जून रोजी श्री देव मायापूर्वचारी सपरिवार देवता अर्चाविधी संपन्न झाले. सकाळच्या प्रहरी स्थलशुद्धी, जलाधिवास, स्नानविधी आणि शय्याधिवास सारखे विधी पार पडले. यानंतर पीठदेवता स्थापना, अग्निस्थापना, वास्तुयजन, ग्रहयजन आणि पर्याय होम असे अनेक महत्त्वपूर्ण यज्ञ पार पडले, ज्यांनी संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता स्थापित केली. प्रत्येक दिवसाच्या सांगतेला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे भाविकांची आध्यात्मिक आणि शारीरिक तृप्ती झाली.

