पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थ साथ देण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून द्या : दीपक केसरकर

मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून होत असलेला विकास अखंडित ठेवणे आपले कर्तव्य

सावंतवाडी । प्रतिनिधी :

नारायण राणे यांच्या रुपाने या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला. आज ते केंद्रातील जेष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे असलेलं खातं हे गोरगरिबांचं कल्याण करणारं खात आहे. देशातील ७० टक्के उद्योग त्यांच्या खात्या अंतर्गत येतात. राज्याचे मंत्री मुख्यमंत्री तसेच आता केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी या जिल्ह्यात विविध विकासाच्या योजना आणल्या. आज जिल्ह्याचा विकास त्यांच्या माध्यमातूनच सुरू आहे. त्यामुळे हा विकास अखंडित ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा संधी देणे आवश्यक आहे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.


लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा वरिष्ठ पातळीवरून केली जाईल मात्र ज्या दिवशी उमेदवारीची घोषणा होईल त्याच दिवशी महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळवडे येथील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
राजकीय जीवनातील संघर्ष हे केवळ वैचारिक व तात्विक विषयावर असतात. ज्यावेळी विकासाचा मुद्दा येतो त्यावेळी आम्ही नेहमीच एकत्र आलो आहोत. कारण निवडणुका येतील व जातील आपण केलेलं काम व कार्य हे शाश्वत राहत असतं. यासाठीच आपण सर्वांनी संघटितपणे व एकसंघपणे देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या ४०० पार खासदारांमध्ये आपला हक्काचा महायुतीचा खासदार निवडून देऊया, असे आवाहन देखील त्यांनी केले.
काँग्रेस राष्ट्रवादीत एकत्र असताना २००९ साली ज्याप्रमाणे मी गावागावात व वाडी वस्तीवर जाऊन लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार केला होता. त्याचप्रमाणे या निवडणुकीत देखील काम करणार आहे. ही निवडणूक पूर्ण होईपर्यंत काही महत्त्वाच्या मीटिंग किंवा पत्रकार परिषदा व्यतिरिक्त मी मुंबईत देखील न जाता या ठिकाणी ठाण मांडून प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महायुतीकडे भाजपा शिवसेना व राष्ट्रवादीचे एवढे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत की सर्व एकत्र आले तर आमच्यासमोर कोणाचाही निभाव लागणार नाही. त्यामुळे आपापसातील मतभेद विसरून जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघपणे एकत्र येऊन या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

तळवडे येथील शेकडो कुंभार समाज बांधव व भगिनींनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजप मध्ये केला प्रवेश

या मेळाव्यात तळवडे येथील शेकडो कुंभार समाज बांधव व भगिनींनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत करीत तुमच्या पाठीशी सदैव उभा राहीन, अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार राजन तेली यांनी केले तर सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काका सावंत यांचे कौतुक केले. तसेच गणेश वासुदेव कुंभार या रील बनविणाऱ्या रील स्टार फॅमिलीचा त्यांनी सन्मान केला. मेळाव्याला उपस्थित तळवडेचे माजी सरपंच विजय रेडकर तसेच ज्येष्ठ पदाधिकारी उत्तम परब यांची भेट घेत त्यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली.